Tuesday, October 19, 2010

करडकवाडी !

www.kardakwadi.org 

नेवासा.... कुबेराची राजधानी असलेले निधी निवास ही पुरातन नगरी पुढे १३ व्या शतकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली. याच पवित्र भूमीत, मायबोलीने अमृतातेही पैजा जिंकल्या! नेवासानगरी मराठी साहित्याच्या अन्‌ वारकरी व संत संप्रदायांच्या मनांत एक वेगळे स्थान मिळवून आहे. परंतु ही नगरी काळाच्या ओघात विकासाच्या बाबत फ़ार मागे पडली. सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाहता समकालीन अन्‌ नंतर स्थापन झालेल्या शहरांपे़क्षा नेवासा शहर आणि तालुका पिछाडीस आहे. जागतिक सांस्कृतिक वारश्यांमध्ये नाव नोंदवले जाण्याची पात्रता असूनही, नेवासा शहर राज्यपातळीवरील अन्‌ देशपातळीवरील तीर्थक्षेत्र अन्‌ पर्यटनाच्या नकाशावर देखील दिसत नाही. खंबीर राजकीय नेतृत्वाचा अभाव अन्‌ दूरदृष्टीच्या राजकीय नेत्यांची कमतरता, यांमुळेच नेवासा शहर अन्‌ तालुका मागासलेला राहिला.

करडकवाडी.... भारतातील पाच लाख खेड्यांपैकी एक असलेले गांव! गेल्या साठ वर्षात भारतातील अनेक खेड्यांनी, गावांनी, शहरांनी अन महानगरांनी ज्याप्रकारे रुप बदलले, त्याचे प्रातिनिधिक उदाहरण ठरावे असे एक खेडे! केवळ १० वर्षापुर्वी, फक्त १०० च्या आसपास लोकवस्ती असलेली करडकवाडी, नव्या युगात, अहमदनगर-औरंगाबाद (राज्य महामार्ग क्र. ६०) अन बीड-नासिक (राज्य महामार्ग क्र. ४४) च्या संगमावर वसलेली आहे.करडकवाडी गावापासुन ११ कि.मी. वर गोदावरी अन प्रवरा या दोन जीवनवाहिन्यांचा संगम होतो (श्री क्षेत्र प्रवरासंगम). करडकवाडी गावापासुन ६० कि.मी. अंतरावर शिर्डी, २० कि.मी. अंतरावर जगप्रसिद्ध श्री शनि मंदिर (श्री क्षेत्र शनिशिंगणापुर), अन ७ कि.मी. वर श्री क्षेत्र देवगड (श्री दत्त संस्थान) आहे. दळणवळणाची साधणे वाढल्याने गावातुन जाणारे दोन्ही राज्य महामार्ग ओसंडुन वाहु लागले, अन करडकवाडी ची लोकसंख्या १०० पासुन १०,००० वर जाऊन पोहचली.
आज मुकिंदपुर (नेवासा फाटा) नावाने ओळखले जाणारे मुळ करडकवाडी गांव मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानले जाते. अहमदनगर अन औरंगाबाद पासुन प्रत्येकी ५५ किमी अंतरावर असलेले हे गांव, मुळ गावकरी, व्यवसायानिमित्त आलेले लोक, तालुका अन जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे-येणे सहज शक्य असल्याने इथे येउन राहिलेले मध्यमवर्गीय लोक, यांच्या संमिश्र लोकवस्तीमुळे 'छोटी मुंबई' ठरतेय.
या उपक्रमाला 'करडकवाडी, वैश्विक खेडे उपक्रम...' हे नाव देताना, आमच्या मनात आहे ते भारतीय राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व, श्री संत ज्ञानेश्वरांची पुण्यभुमी, महात्मा गांधी यांची ग्रामविकासाची संकल्पना, अन औद्योगिकरणामुळे-शहरीकरणामुळे रुप पालटलेले भारतातील एक प्रातिनिधीक गांव!

1 comment: