Tuesday, October 19, 2010

सुस्वागतम !!!

आज 'श्री बाळकृष्ण ज्ञान केंद्र, करडकवाडी' आणि 'करडकवाडी...वैश्विक खेडे उपक्रम' ह्या उपक्रमाचे हे संकेतस्थळ प्रकाशित करत असताना आम्हांला मनापासून आनंद होतो आहे.  www.kardakwadi.org 

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांच्या वास्तव्य असलेल्या नेवासा तालुक्यामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर, वाचण संस्कृतीचा विकास याद्वारे ग्रामविकासाची संकल्पना मनात ठेऊन 'करडकवाडी- वैश्विक खेडे उपक्रम' राबविला जात आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि युवक- युवतींना उच्च-शिक्षण, शेती, आरोग्य, क्रीडा, सामाजिक आणि राजकीय विषयांवर सहकार्य करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे. ग्रामीण भागातील युवकांसाठी 'ज्ञान केंद्रा'ने अनेक उद्दिष्टे समोर ठेवली आहेत. त्यापैकी प्रगत राष्ट्रांमधील नागरिकांच्या राहणीमानाच्या दर्जाप्रमाणेच, ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे आणि 'मानवी विकास निर्देशांक' या संकल्पनेची ओळख सर्वसामान्यांना करून देणे. सामान्य नागरिकाचे दैनंदिन जगणे सुसह्य व्हावे यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न करणे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीमध्ये मदत करणे. शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण विद्यार्थी ज्या क्षेत्रांत मागे पडतात, ती क्षेत्रे लक्षात घेऊन त्या उणिवा दूर करण्यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांना साहाय्य करणे. तरुणांना उच्चशिक्षणासंबंधी संधींची, रोजगाराच्या अन्‌ स्वयंरोजगाराच्या संधींबद्दल माहिती पुरवणे. शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, क्रीडा, आरोग्य, सामाजिक अन्‌ राजकीय क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे प्रबोधन करणे आणि सामान्य नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे, अशी काही महत्त्वाची उद्दिष्टे आहेत.
शहरांमध्ये आणि प्रगत देशांमध्ये 'माहितीचा स्फोट' होत असतानाच ग्रामीण भागात मात्र माहितीच्या अभावामुळे 'बौद्धिक कुपोषण' होत आहे. ग्रामीण  आणि शहरी भागातील विद्यार्थी, युवक-युवती यांच्या मध्ये एक सहकार्याचा सेतु बांधण्याचे काम या ज्ञान केंद्राला करण्यात येणार आहे.
निसर्गाचे वरदान आणि कर्तुत्ववान व्यक्तिमत्वांचा खजिना असलेल्या आपल्या भागातील प्रागतिक विचारांच्या युवकांना एकत्रीत करणे गरजेचे आहे.  शिक्षण, संशोधन, क्रीडा, शेती, आरोग्य यांचा आलेख दर्शवणार्‍या 'मानवी विकासाच्या निर्देशांकाची' संकल्पना ग्रामीण जनतेमध्ये रुजवणे गरजेचे आहे. म्हणुन, ग्रामीण सुशिक्षित युवकांचे संघटन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यादृष्टीने श्री बाळकृष्ण ज्ञान केंद्र ह्या संस्थेची स्थापना केली गेली आहे.


आपल्या सूचना, मार्गदर्शन आणि सहकार्याची अपेक्षा. धन्यवाद!
ई-मेलः kardakwadi@gmail.com 

No comments:

Post a Comment