Tuesday, October 19, 2010

हे सर्व कशासाठी

www.kardakwadi.org 

कुबेराची राजधानी असलेल्या 'निधी-निवास' नगरीला तिचे भौतिक व सांस्कृतिक वैभव पुन्हा प्राप्त करून देणे, हे आमचे प्रमुख ध्येय आहे. श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले नेवासा शहर अन‌ नेवासा तालुका यांचा सर्वांगीण विकास (भौतिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि राजकीय) या गोष्टींचा विचार हा श्री बाळकृष्ण ज्ञान केंद्राचा उद्देश आहे.
कुबेराची राजधानी असलेले निधी निवास ही पुरातन नगरी पुढे १३ व्या शतकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली. याच पवित्र भूमीत, मायबोलीने अमृतातेही पैजा जिंकल्या! नेवासानगरी मराठी साहित्याच्या अन्‌ वारकरी व संत संप्रदायांच्या मनांत एक वेगळे स्थान मिळवून आहे. परंतु ही नगरी काळाच्या ओघात विकासाच्या बाबत फ़ार मागे पडली. सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाहता समकालीन अन्‌ नंतर स्थापन झालेल्या शहरांपे़क्षा नेवासा शहर आणि तालुका पिछाडीस आहे. जागतिक सांस्कृतिक वारश्यांमध्ये नाव नोंदवले जाण्याची पात्रता असूनही, नेवासा शहर राज्यपातळीवरील अन्‌ देशपातळीवरील तीर्थक्षेत्र अन्‌ पर्यटनाच्या नकाशावर देखील दिसत नाही. खंबीर राजकीय नेतृत्वाचा अभाव अन्‌ दूरदृष्टीच्या राजकीय नेत्यांची कमतरता, यांमुळेच नेवासा शहर अन्‌ तालुका मागासलेला राहिला. प्रवरामाईच्या कुशीत वसलेल्या ह्या नगरीला पुन्हा एक स्वप्न दाखवायचे आहे. नेवासानगरीला तिचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्याची मनात जिद्द अन्‌ मनगटात जोर असणार्‍या सर्वांसाठी हे खुले व्यासपीठ!
*****
करडकवाडी गांव आणि नेवासा तालुका हि फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रातील कुठल्याशी गावात वा शहरात जर कुणी असा प्रयत्न करणार असेल, तर त्या प्रयत्नाला यथाशक्ती मदत करण्याची ग्वाही आम्ही देउ इच्छितो. 'बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो' अशी जिद्द बाळगणार्‍या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

*****
मूलतः नेवासा तालुक्यातील परंतु सध्या शिक्षण/नोकरीसाठी देशा-विदेशांमध्ये कार्यरत असलेल्या तरुणांच्या मदतीने ही चळवळ आकार घेत आहे. नेवासा तालुक्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक क्षेत्रांमधील नवीन कल्पना राबवून ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी एक पाऊल टाकण्याचा हा प्रयत्न आहे. शिक्षण, शेती, आरोग्य या मूलभूत विषयांवर जनजागृती करणे अन्‌ 'मानवी विकास निर्देशांकाबद्दल' (Human Development Index) सामान्य जनतेला जागृत करणे, विकसित देशांतील समाजांप्रमाणे विकसित समाजाचे स्वप्न भारत देशामध्ये साकार करण्याच्या अनेक प्रयत्नांना हातभार लावणे, हा श्री बाळकृष्ण ज्ञान केंद्राचा हेतू आहे.
उद्दिष्टे:  नेवासा तालुका हे एक प्राथमिक युनिट मानून पुढील कार्यक्रम राबवणे:
१) प्रगत राष्ट्रांमधील नागरिकांच्या राहणीमानाच्या दर्जाप्रमाणेच, ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे आणि 'मानवी विकास निर्देशांक' या संकल्पनेची ओळख सर्वसामान्यांना करून देणे. सामान्य नागरिकाचे दैनंदिन जगणे सुसह्य व्हावे यासाठी हरप्रकारे प्रयत्न करणे.
२)ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीमध्ये मदत करणे. शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण विद्यार्थी ज्या क्षेत्रांत मागे पडतात, ती क्षेत्रे लक्षात घेऊन त्या उणिवा दूर करण्यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांना साहाय्य करणे.
३) तरुणांना उच्चशिक्षणासंबंधी संधींची, रोजगाराच्या अन्‌ स्वयंरोजगाराच्या संधींबद्दल माहिती पुरवणे.
४) शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, क्रीडा, आरोग्य, सामाजिक अन्‌ राजकीय क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे प्रबोधन करणे.
५) सामान्य नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे.

सर्वसाधारण उद्दिष्टे:
शेती: शेतीकडे व्यावसायीक दृष्टीने पाहणे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यने उत्पादन वाढवणे अन खर्च कमी करणे. घरातील एक व्यक्ती शेतीकडे अन एक व्यक्ती शेती आधारित उद्योगाकडे वळवणे. शेतीच्या माध्यमातुन खेडी स्वयंपुर्ण करण्याचा प्रयत्न करणे.
आरोग्यः सर्वसामान्य आरोग्य विषयक सल्ला अन सेवा. साथीचे अन संसर्गजन्य आजारापासुन सामान्य जनतेचे रक्षण होईल अशी माहीती जनतेला उपलब्ध करुन देणे. सरकाती आरोग्य सेवेबद्दल/योजनांबद्दल माहिती देणे, हृदयरोग, कर्करोग यांसारख्या दुर्धर आजारांशी लढा देण्यासाठी जनतेला मार्गदर्शन करणे, तालुक्याच्या ठिकाणाहुन अहमदनगर-पुणे-मुंबई ला रुग्णवाहतुक करण्यासाठी अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करणे.
शिक्षणः तालुक्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण- नोकरी- स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती करुण देणे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यां बरोबर स्पर्धा करण्यासाठी करडकवाडी येथे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र सुरु करणे. तालुक्यामध्ये वाचन संकृतीचा विकास करणे, त्यासाठी एक सुसज्ज ग्रंथालय उभे करणे. (ऑनलाईन पुस्तक खरेदी सुविधा उपलब्ध करुन देणे).
क्रिडा: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी मैदानी अन इन-डोर खेळाची साधणे उपलब्ध करुन देणे. त्यांच्यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडुंची मार्गदर्शनपर शिबीरे आयोजीत करणे. विशेषतः मुलींना खेळामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे. सशक्त, निरोगी अन निकोप स्पर्धा करणारी पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करणे!
राजकीय: सत्ता हे समाजसेवेचे प्रभावी साधन आहे, हा विचार समाजामधे रुजवणे. सुशिक्षित तरुणांनी राजकीय क्षेत्राकडे वळावे म्हणुन प्रयत्न केले जातील. योग्य उमेदवार निवडले जावेत म्हणुन जनतेचे प्रबोधन केले जाईल. उमेदवाराकडे किती संपत्ती आहे, त्यापेक्षा त्याच्या मतदारसंघातील जनतेसाठी काय योजना आहेत, सामाजीक जीवनामध्ये तो किती प्रामाणिक आहे, पुढील पिढी साठी काय स्वप्नं आहेत, हे पाहिले पाहिजे. निवडणुक गैरप्रकारांना आळा घालणे, पैसा, गुंडशाही ला विरोध करणे अन ग्रामपंचायत ते लोकसभा पातळीवर सुशिक्षित उमेदवारांना पाठींबा दिला जाईल. प्रचलित जात-धर्म-संपत्ती आधारित राजकारण सोडुन, विकसित जगात ज्याप्रमाणे 'विकासाचे राजकारण' केले जाते त्याप्रमाणे राजकीय चळवळ उभारणे, हे आमचे उद्दिष्ठ आहे.

No comments:

Post a Comment